Sunday, September 19, 2010

गणपती बाप्पा मोरया !!!

नेहमीप्रमाणे वाजतगाजत गणपती आले. गेल्या काही वर्षांत, विशेषतः जेव्हापासून माझ्या जाणीवा आणि संवेदना अधिक तीव्र झाल्या तेव्हापासून मी दरवर्षी गणपती आलेला पाहतो. दहा दिवस थांबतो आणि विसर्जन...पुन्हा पुढल्यावर्षी आहेच...माझ्या आयुष्यात गणपती येण्याने आणि त्याच्या दहा दिवस थांबण्याने काय फरक पडतो, याचा मी यंदा विचार केला...विचारांची ही प्रक्रिया अजूनही सुरू आहे. आतापर्यंत काहीच विशेष फरक पडल्याचे जाणवले नाही. कदाचित संस्कृतीरक्षक मला असं सांगून समजाविण्याचा प्रयत्न करतील, की लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधनासाठी आणि सामाजिक ऐक्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली वगैरे...ओके. मानलं. पण आता काय?आता याचा वापर केवळ राजकीय शक्तीप्रदर्शनासाठीच होतो, आणि काही जणांसाठी गणपती हे अर्थाजनाचं साधन आहे. या पलीकडे गणपतीचं महत्त्व काय?लालबागचा राजा...माझ्यामते केवळ मीडियानं मोठा केलेला गणपती.बारकाईन विचार केल्यावर आणि पाहिल्यावर अनेक गोष्टी मला अस्वस्थ करून गेल्या. ज्या दिवशी गणपती आले त्यावेळी मिरवणुकीला ढोल-ताशाच्या तालावर अनेक मुलं नाचत होती. स्पष्ट सांगायचे तर बहुजन समाजातील. आणि त्यांच्या मागे सवर्ण घरातील मुंल हातात गणपती घेऊन...हीच ती बहुजन समाजातील मुलं दहा दिवस रात्रभर जागून गणपती साजरा करतात. त्यांचा त्या गणपतीशी तेवढाच काय तो संबंध. आणि सवर्ण घरातील मुलं सकाळ-संध्याकाळ आरती आणि मग अभ्यास. आज असलेलं हे चित्र 25 वर्षांनी काही वेगळं नसेल. याचं कारण म्हणजे आज गणपतीच्या पुढ्यात नाचणारी ही मुलं 25 वर्षांनी त्यांच्या मागे म्हणजे गणपती घेऊन किंवा आरती करून अभ्यास करालया बसलेल्या मुलांच्या गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करणार. गणपतीत पुन्हा दहा दिवस नाचगाणी करणार, रात्री जागविणार. आणि त्यांचे मालक आपल्या मुलाकडून आरती करून घेऊन त्याला अभ्यासाला बसविणार...जागतिकीकरणाच्या आणि अणुकराराचा झेंडा मिरवणा-या देशात विषमतेचे यापेक्षा जळजळीत उदाहरण आणखी काय हवे...सुजाण माणसं म्हणतील की हे खरयं किंवा खोटंय किंवा अतिरेकी आहे. ..पण हे वास्तव आहे...आपल्यासारख्या लबाड झालेल्या लोकांनी (सभ्यपणाच्या बुरख्याआड संवेदना लपविलेल्या लोकांनी) हे वास्तव नाकारायचं असं ठरवलं आहे !!!

Monday, March 15, 2010

गंमतजंमत दुबईतल्या साहित्य संमेलनाची

दुसरे मराठी विश्व साहित्य संमेलन गाजले ते विविध कारणांनी. वाद, मराठीसाठी आवश्यक आणि अपेक्षित असलेल्या पण न झालेल्या चर्चा, झालेली गॉसिप्स, स्वागताध्यक्षांची घुसखोरी, आयोजकांची तारांबळ, आणि बरंच काही...या विश्वसाहित्य संमलेनाला चक्क एक मराठी रँचोही गेला होता...रँचोच्या कॅमे-यात टिपली गेलेली ही काही क्षणचित्र...

चकटफू टूर आणि मराठी पत्रकार !

विश्व मराठी साहित्य संमलेन...तेही दुबईत...आणि तमाम पत्रकारांना आमंत्रण (म्हणजे चकटफू ट्रीप) हा म्हणजे दुग्धशर्करा योगच ! त्यामुळे मुंबईतून सकाळी नऊ वाजता जाणा-या विमानाला अपेक्षित रिपोर्टींग टाईम सकाळी सहा असला तरी पत्रकारांनी पहाटे पाचपासूनच विमानतळावर गर्दी केली होती.
मजल-दरमजल करत अखेर विमानात आसनस्थ झाल्यानंतर दुबई येईपर्यंत एक छोटीशी झोप झाली...मग दुबईत पाय ठेवताच सगळे एकदम फ्रेश...
सर्वसाधारणपणे 16 ते 18 तास प्रवास केल्यानंतर जेटलॅग येतो असं आजवर ऐकलेलं...पण दुबईची वेळ भारताच्या दीडच तास मागे असली तरी हॉटेलवर पोहोचल्यावर काही पत्रपंडितांमध्ये जेटलॅग आल्याची चर्चा होती...असो !
स्वागताध्यक्ष धनंजय दातार यांनी स्वागत केल्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. संमलेनाची तयारी, आलेले साहित्यिक किंवा कार्यक्रमपत्रिका याच्यावर साधारणपणे प्रश्नोत्तरे होणे अपेक्षित होते...मात्र दुबईत आल्यानंतर मनात जे प्रश्न पडावे त्यांचे निरसन या पत्रकार परिषदेत अगदी यथासांग झाला. मग सिटी टूर...
टूर निघाली दुबई दर्शनाला...मनभरून दुबई पाहताना काहींनी आपण यापूर्वी गेलेल्या जंकेटमध्ये काय केले याचे अनुभव शेअर करतानाच तसेच प्लॅन्स या टूरमध्येही कसे आखता येतील या कल्पनांचे व्हर्च्युअल प्रेझेंटेशन झाले. मग काय पुढचे चार दिवस जीवाची झाली दुबई !

‘मान’ पत्रकारांचा ‘धन’ दातारांचे ?

विश्व साहित्य संमेलन कव्हर करायला खासा वेळ काढून दुबईला पोहोचलेल्या पत्रकारांचा यथोचित मान झाला नसता तर केवढा अपमान झाला असता ? चाणाक्ष दातारांना याची पूर्ण कल्पना असल्यानेच त्यांनी मग थेट डिलिंगचा विषय काढला, अशी चर्चा शेवटच्या दिवशी ऐकायला मिळाली. पत्रकारांना काय देऊन सन्मानित करावे, असा प्रश्नाचा चेंडू ‘दाता’रांनी ‘ज्येष्ठ आणि अनुभवी’ पत्रकारांच्या कोर्टात टाकला. अगदी सफाईने हा चेंडू टोलवताना फार काही नाही, पाचशे दिराम दिले तरी चालतील, लोकांना हवे ते घेता येईल, अशी एक सोयीची सूचना आल्याचे कळते. मग काय ज्या डिनर पार्टीत ही चर्चा झाली, तिथल्या काही पत्रकारांना याची कुणकुण लागल्याने त्यांनी याला विरोध होऊ शकतो, वगैरे भूमिका घेतली. त्या डिनर पार्टीनंतर दातारांनी काही ज्येष्ठ पत्रकारांची परिषद घेतली. ब्लॅक लेबलच्या साक्षीने झालेल्या या परिषदेत काही निर्णय झाला. या निर्णयाची खबर कुणालाही लागली नाही. मात्र या निर्णयाला उलगडा त्याच्या पुढच्या दिवशी रात्री झाला. 27 पत्रकारांपैकी 9 पत्रकारांना दिवाण-ए-खासमध्ये मेजवानीचे निमंत्रण मिळाले. तर 18 पत्रकार दिवाण-ए-आममध्ये जेवले. नऊ पत्रकारांच्या या नवलाईची बातमी कळताच 18 जण आंदोलनाच्या पावित्र्यात आले. मग असे कळले की, 500 दिराम संकल्पनेच्या विरोधामुळे पत्रकारांची एकजूट फुटली. अशीही चर्चा नंतर ऐकायला मिळाली की, ठरलेले 27 गुणिले 500 दिरामचे समीकरण 27 गुणिले 500 दिराम भागिले 9 अशा सूत्राने सोडवण्यात आले....मात्र हे सर्व कळते-समजते !

घोळाचे संमेलन...(दिवस पहिला)

किमान दुबईत स्थायिक असलेल्या भारतीयांकडून तरी वेळ पाळली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र भारतातून दुबईत दाखल झालेल्या मंडळींना अजिबात आपण परदेशात आहोत हे फिलींग न देण्याचाच जणू आयोजकांचा हेतू होता. त्यामुळे सायंकाळी सहा वाजता उदघाटन नियोजित असले तरी प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू व्हायला रात्रीचे आठ वाजले. त्यात महाराष्ट्रातून गेलेल्या मंत्र्यांनी भाषणासाठी राखून ठेवलेल्या दहा मिनिटांऐवजी तब्बल 20-20 मिनिटे खाल्याने आणि एकूणच संमलेनाध्यक्ष मंगेश पाडगावकर यांच्यासमोर आपली प्रतिभा दाखवण्यासाठी उत्सुक लोकांनी हातात माईक आल्यावर शक्य तितकावेळ आपल्याकडेच माईक राहील, अशा पद्धतीने भाषणे केल्याने कार्यक्रमपत्रिकेवरील वेळ आणि प्रत्यक्षातील वेळ यात बरेच अंतर पडले.
“...आठ वक्ते बोलल्यावर काही बोलू नये ” या आपल्याच कविवतेतील ओळींनी सुरुवात करत पाडगावकरांनी त्यांच्यासकट बोअर झालेल्या लोकांची व्यथा कवितेच्या माध्यमातून मोकळी केली. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या झालेल्या गळचेपीचा चांगलाच समाचार आपल्या भाषणातून घेतला. कोणताही झेंडा हाती न घेता लिखाण करण्याच आवाहन करत जोरजबरदस्ती करणा-यांना आव्हान दिले !
कार्यक्रमपत्रिकेनुसार उदघाटन सोहळ्यानंतर मंगेश पाडगावकर यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आता संमेलनाध्यक्षांनी उदघाटनाचे भाषण केल्यानंतर स्वाभाविकपणे पत्रकारांनी मीडिया सेंटरच्या दिशेने धाव घेत बातमी देण्यासाठी पळापळ सुरू केली. 27 पत्रकार आणि चार संगणक...मग काय आयोजकांबरोबर अक्षरशः बा..चा...बा...ची !
एकिकडे पत्रकारांचा घोळ सुरू असताना दुसरीकडे रात्री उशिरा साडे अकरावाजताच्या दरम्यान पाडगावकरांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला...एरवी पाडगावकरांची मुलाखत म्हटली की महाराष्ट्रात पाच-सहाशे लोकांची गर्दी तर अगदी सहज...पण दुबईत पाडगावकरांच्या मुलाखतीला स्वतः पाडगावकर, दोन मुलाखतकार यांच्यासह केवळ 20 लोक ऑडिटोरियममध्ये उपस्थित होती....
रँचोसकट सगळ्यांचे पेशन्स संपले होते....आणि मग तरीही ‘ ... या जगण्यावर शतदा प्रेम करावे ’ या पाडगावकरांच्याच कवितेतील ओळी गुणगुणत अखेर रात्री साडेबाराच्या दरम्यान टूरिस्ट साहित्यप्रेमी पुन्हा हॉटेलवर पोहोचली...
...सगळ्यांची एकदम बॅटरी डाऊन...(काहींनी मद्याच्या सहाय्याने चार्जिंग केलेही पण वेळेअभावी बॅटरी फूल झाली नाही !)

(दिवस दुसरा)

दुबईत एक लोच्या आहे..कसलंही जाहीर प्रदर्शन करता येत नाही. त्यामुळे मग ग्रंथदिंडीही निघाली तरी संमलेन ज्या ऑडिटोरियममध्ये होते त्या हॉलमध्येच...पण चांगली झाली ग्रंथ दिडी...
दुस-या दिवशी भोजनापर्यंतचे कार्यक्रम तरी सुरळीत सुरू होते...दुपारच्या जेवणानंतर मात्र ख-या अर्थाने संमेलन सुरू झाले. म्हणजे वादाची ठिणगी पडली. निमित्त होते नृत्यांगना रंजना फडके यांना निमंत्रण देऊनही कार्यक्रमाचे सादरीकरण न करू दिल्याचे. संमेलनादरम्यान रंजना फडके यांच्या नृत्याविष्काराचा कार्यक्रम दररोज आयोजित करण्यात आला होता. मात्र पहिले दोन्ही दिवस त्यांना अजिबात नृत्य सादर करण्याची संधी आयोजकांनी दिली नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचा अपमान झाला. नेमका हाच धागा दातारांनी पकडला. धनंजय दातार यांनी हा विषय चांगलाच लावून धरला आणि दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पाटील आणि अखिल भारतीय मराठी साहित्यमहामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्यावर मीडियाच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले.
रात्री दातार यांनी मीडिया प्रतिनिधींना दिलेल्या विशेष पंचतारांकित पार्टीत तर आपण काय आणि कसे कॉन्ट्रॅक्ट दुबई महाराष्ट्र मंडळाबरोबर केले त्याच्या फोटोकॉपीच वाटल्या. रँचोचे कान टवकारले...मग काय बातमी मागची बातमी काढण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. साधारणपणे पाच पेग पोटात गेल्यानंतर अनोळखी व्यक्तीबाबत जी आत्मियता निर्माण होते, त्या आत्मियतेने मग दुबईस्थित मंडळींनी माहिती दिली. ती अशी की “मूळात स्वागताध्यक्ष दातार यांचा या संमलेनाशी काही संबंध नाही...त्यांचा तसा संबंध तर दुबई महाराष्ट्र मंडळाशीही नाही...पण या संमलेनाच्या निमित्ताने प्रसिद्धी अगदी सहज होईल हे दातारांसारख्या चाणाक्ष उद्योजकाच्या लक्षात आल्याने त्यांनी ही संधी साधली. मूळात या संमेलनाचे आयोजनकर्ते होते दुबई महाराष्ट्र मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ. त्यामुळे मग या संमलेनाचा सर्व खर्च करण्यासाठी प्रायोजकत्व देत दातारांनी स्वागताध्यक्ष पद मिळवले. पण महामंडळातली मंडळी असे अनेक कार्यक्रम कोळून प्यायलेली असल्याने त्यांनी दातारांना महत्त्वच न देत आपला अजेंडा राबवायला सुरूवात केल्याने मग वादाची ठिगणी पडली...’’ (ही सर्व माहिती कळते समजते या सदरात मोडते. पण...)

दिवस तिसरा आणि ‘लाख’मोलाचा अपमान

रात्री झालेल्या वादाच्या मोठ्या बातम्या सर्वत्र झळकल्यावर, चला मसाला मिळणार म्हणून सगळ्याच पत्रकारांच्या आशा पल्लवित झाल्या. साहित्य संमेलनाच्या ठिकाणी जाण्यासाठी सर्वजण हॉटेलच्या लॉबीत जमा झाले तोच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण रात्री ज्यांच्यात वाद झाला होता ते धनयंज दातार, दुबई महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा संजीवनी पाटील आणि मिस्टर कौतिकराव ठाले-पाटील हेच लॉबीत हजर. हे इकडे कसे असे भाव सर्वांच्याच चेह-यावर होते. मग दातारांनीच खुलासा केला की आमच्यातील वाद मिटलेत आणि आम्ही रंजना फडके यांची मनधरणी करण्यासाठी इथे आलो आहोत. एवढा खुलासा करून दातार, संजीवनी पाटील आणि कौतिकराव ठाले-पाटील रंजना फडके यांच्या मनधरणीसाठी त्यांच्या रूममध्ये गेले. आणि येताना त्यांना घेऊनच खाली आले. रंजना फडके यांचा अपमान झाल्यानंतर त्यांना अखेर नृत्याची संधी तर दिलीच, पण एक लाख एक हजार रुपयांचे मानधन देत दातारांनी अपमान भरपाई करण्याचा प्रयत्न केला.
सर्व सुरळीत झाले म्हणून मग पत्रकारांमध्येही पुन्हा दुबई दर्शनाची चर्चा सुरू झाली आणि तेवढ्यात कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले की, मी रंजना फडके यांची मनधरणी केलीच नाही. कार्यक्रमात आवश्यक ते बदल मी केले...पण मला दुबईत येईपर्यंत कार्यक्रम पत्रिकाच माहित नव्हती...कौतिकराव ठाले-पाटील यांनी एकेक्या वाक्यामागे एकेक ब्रेकिंग न्यूज दिल्याने पुन्हा एक नवा उत्साह संचारला. आणि मग मराठी पापाराझ्झींनी आपल्या बसमधून सुरू केला दातारांच्या रोल्स रॉईस गाडीचा पाठलाग !

संमलेनाच्या ठिकाणी पोहोचल्यावर दारातच मग पुन्हा एकदा ठाले-पाटील आणि पत्रकार यांची ‘खडा’जंगी झाली. ठाले-पाटील यांनी मग तुम्हाला ज्या पटट्या चालवायच्या त्या चालवा...ज्या बातम्या लावायच्या ते लावा...तुमच्यामुळेच हे वाद पेटलेत, असे सांगत सराईतपणे मीडियावर खापर फोडण्याचा प्रयत्न केला.
विझलेल्या ठिणगीतून पुन्हा वणवा पेटल्याने दातारांनीही मग ठाले-पाटलांना फक्त आपल्या रोल्सरॉईसमधून फिरण्यात इंटरेस्ट होता असे सांगत टीकास्त्र सोडले...
...असे कसेबसे साहित्य संमलेनाचे सूप वाजले !

...एवढ्या सर्व हॅपनिगंमध्ये पाडगावकर मात्र दुर्लक्षितच होते. तसेच शोधमोहिम घेतल्यावर लक्षात आले की, अरेच्चा विश्व साहित्य संमलेन म्हणून होणा-या या कार्यक्रमात पाडगावकर वगळले तर कुणीच साहित्यिक नाहीत...

...दुस-या विश्व साहित्य संमेलनातून काय हाती लागले, हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. (तसे हे संशोधन प्रत्येकच संमलेनाअंती होऊ शकते !) असो...पण चमकेश लोक चमकले, आयोजक गोंधळले, आणि पत्रपंडितांच्या जीवाची दुबई झाली...थोडक्यात काय तर ‘ALL WAS WELL’


Sunday, July 19, 2009

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात...

सध्या सगळीकडे एक गोष्ट कायम ऐकायला येते की, मी फारच बिझी आहे. बिझी असणे हा जणू परवलीचाच शब्द बनलाय...पण नक्की बिझी असण्याची अवस्था म्हणजे काय असते ?
मानवाला मिळालेली दैवी देण म्हणजे मन. बिझी असण्यात मन किती बिझी असते, याचा सखोल विचार केला तर लक्षात येईल की बिझी म्हणवणा-या देहात असलेले मन खरोखरच बिझी आहे की सगळा नुसताच व्यर्थबोध !
मनाप्रमाणे काम नसले की माणसे केवळ शरीरारने कार्यरत असतात, आणि मनाप्रमाणे काम मिळाले तरी शारिरीक श्रमापासून सुटका नाही. तर अशावेळी मनाचा विचार कितीवेळा होतो...
अनेक दिवसांनी केवळ मनाचा विचार करण्यासाठी काही वेळ राखून केवळ मनाचा विचार केला. त्यावेळी मनामध्ये अनेक दिवसांपासून, अनेस विषयांवरच्या प्रश्नांचा केवळ कल्लोळ झालेला दिसला....या कल्लोळाला असलेली अथांगता पाहून मनात प्रचंड भीती निर्माण झाली...
...वाटलं की, मनात निर्माण झालेले एवढे प्रश्न, म्हटलं तर थेट आपल्याशी आणि आपल्या सभोवताली असणा-यांशी संबंधित...कधी सोडवणार आपण हे प्रश्न आपल्या बिझी असण्यातून....केवळ बिझी नाही तर मानवी जीवनातील असमाधानही कायम आहे, द्वंद्व संपत नाही, द्वेष-हेवा-मत्सर-स्वार्थ यांचा मनावरील पगडा जात नाही.

अशावेळी काय करायचे ?

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात मी खोलवर बुडून गेलोय...

Friday, July 3, 2009

गगना गंध आला...

...यावेळी पावसाची चातकापेक्षाही अधिक आतुरतेने वाट पाहात होतो. कंटाळलेल्या मनाने मग कुमार गंधर्वांचा मारवा आणि मग किशोरी आमोणकरांचा मेघ मल्हार ऐकला. कदाचित ते स्वर्गीय स्वर आळवले गेले असल्याने मुंबईत तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झालीये.

खिडकीतून पाहता येणारी आणि ऐकता येणारी पावसाची रिपरिप, आणि कुमारांचा आलाप, हा खरचं एक स्वर्गीय आनंद आहे. या निमित्तान संगीतावर ( ज्याची दुर्देवाने आता साथ सुटते आहे असं वाटतय ! ) काही काळ चिंतन केले...याच चिंतनाचा काही भाग तुमच्यासाठी....तुमच्या मनातील चिंतनही या निमित्ताने मी प्रतिक्रियांच्या माध्यमातून अपेक्षित आहे, या निमित्ताने धकाधकीच्या आयुष्यात थोडे मंथन होईल, अशी आशा मनाशी आहे.

शास्त्रीय संगीत जितका अभिजात प्रकार तितकाच काहीसा (काहींसाठी कंटाळवाणा), त्यामुळेच मग भावसंगीत या मातीत चांगलेच रुजले. किंबहुना शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातून उगम पावलेली, तरीही शास्त्रीय संगीताकडे पूर्णतः न झुकलेली शब्दप्रधान गायकी ‘भावसंगीत’ या संज्ञेने ओळखली जाते. शब्द, सूर, ताल, लय, आणि काव्यानुसार व्यक्त होणार्‍या संमिश्र भावना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘भावसंगीत’.
संगीताचा हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राचे अनोखेपण अधोरेखित करणारे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधात गायक कलाकारालाच नव्हे तर गीतकार, संगीतकार यांनाही अनेक प्रकारची कलात्मक व्यवधाने सांभाळावी लागतात. शब्दामागील स्वरांना किती स्पर्श करायचा, चालीतील दोन शब्दांतील अंतर, त्या शब्दांवर दिलेल्या विशिष्ट स्वरसंगती, स्वरसमूहातील अंतर आणि त्यामागील भावार्थ समजून काव्य तरल स्वरात मांडणे - हा भावसंगीताचा गाभा आहे. या गायकीसाठी गळ्याची वेगळी तयारी हवी, शब्दफेक तरल हवी, शब्द टाकण्याच्या पद्धतीत एक उत्कटता हवी, काव्यातलं ‘एक्स्प्रेशन’ गाण्यात मांडण्याची ताकद हवी, गाणार्‍याची तन्मय भाववृत्ती हवी -केवळ ताना, बोल ताना, सरगम घोटून हे येत नाही. हवा तो स्वर आवश्यक तितक्याच तीव्रतेने लागायला हवा. या सार्‍यांच्या जोडीला कलाकाराची वैयक्तिक प्रतिभा, शब्द आणि त्यांचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ शोधण्याची वृत्ती, संगीतकाराने सांगितलेली चाल आत्मसात करण्याची क्षमता आणि सादरीकरणातील मनःपूर्वकता - यांची नितांत आवश्यकता असते.

कवितेला जसे वृत्त असते, तशीच भावसंगीत गायनाची एक वृत्ती जोपासावी लागते. त्यासाठी काव्याची उत्तम, तरल जाण लागते. भावसंगीत हा गीतकार, संगीतकार, वादक आणि गायक यांनी सजवलेला संगीतरथ असतो. शब्द जितके सुंदर, जितके नेमके, तितकी चाल, सूर सहज उमटतात. अनेकदा ते शब्दच सूर घेऊन येतात. त्यांना नटवण्याचे काम संगीतकाराची प्रतिभा करते. कवी आणि संगीतकार मिळून एक ‘म्यूझिकल फ्रेमवर्क’ तयार करतात. त्याचे कानेकोपरे सुरेल करून उजळण्याचे काम गायक करतात.

कला ही आनंदनिर्मितीसाठी असल्याने सर्वांपेक्षा आनंदरस महत्त्वाचा असतो. मीलनाचे वा विरहाचे गीत असले, तरी ऐकणा-याला त्यातून आनंदाची अनुभूती येणे महत्त्वाचे असते...

काहीही असो...पाऊस आला आणि गगना गंध आला !

Friday, June 26, 2009

एका शापित गंधर्वाचा अंत...

मायकल जॅक्सन मेला !...एका शापित गंधर्वाचा हा अंत अत्यंत चटका लावून गेला...मायकल मेला..असं म्हणताना मनाला यातना होताहेत...पण 'तो मेला' हे क्रियापद केवळ त्याच्यावरील प्रेमापोटीच.
शाळेत असल्यापासूनच विशेषतः जेव्हापासून पाश्चात्य संगीत कळायला लागलं, त्याबद्दल माहिती झाली तेव्हा एलिटन जॉन असेल, जॉर्ज मायकल असेल किंवा अन्य कोणी...पण कायम पारायण ज्याच्या गाण्यांचे केले तो एकमेव मायकल जॅक्सन होता..
मायकलच्या प्रत्येक गाण्यात किंवा अल्बममध्ये केवळ व्यावसायिक एप्रोज नव्हता तर त्याला एक थीम होती...ही थीम केवळ मार्केटिंगसाठी नव्हती तर त्या थीमला एक सामाजिक आशय होता...
कलाकाराने त्याची प्रतीभा जर सामाजिक भान राखून समाजकारणासाठी वापरली तर त्याचा परिणाम किती आणि कसा साधला जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मायकल जॅक्सन. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास व्हिएतनाम युद्धाच्यावेळी अमेरिकेने विशेषतः 'काळ्या' लोकांच्या हिंसेविरोधात मायकल जॅक्सनने अशाच पद्धतीने आपल्या गीताच्या माध्यमातून आवाज उठवला होता...त्या गीताच्या काही ओळी खालीलप्रमाणे...
"Heal The World"
There's A Place InYour HeartAnd I Know That It Is Love
And This Place CouldBe MuchBrighter Than Tomorrow
And If You Really TryYou'll Find There's No Need To Cry
In This Place You'll FeelThere's No Hurt Or Sorrow
There Are WaysTo Get There
If You Care EnoughFor The Living
Make A Little Space
Make A Better Place
...Heal The World
Make It A Better PlaceFor You And For Me
And The Entire Human Race
There Are People Dying
If You Care Enough
For The Living
Make A Better PlaceFor You And For U and For me.
एखाद्या व्यक्तीची विशेषतः कलाकाराची संवेदना जोपर्यंत जागृत असते तोपर्यंतच त्याची निर्मितीक्षमता शाबूत असते...मायकलमध्ये ही संवेदना तो मरेपर्यंत कायम होती...त्याच्यातली संवेदना जशी त्याच्या निर्मितीक्षमतेचा स्त्रोत होती, तशीच त्याच्या आजूबाजूला वावरणा-या व्यक्तींच्याही निर्मितीक्षमतेचा स्त्रोत होती, याचे उदाहरण मायकलची सख्खी बहिण जेनेथ जॅक्सन...
मायकलच्या कलेबद्दल तर काय बोलावं, शब्दच म्यान होतात. गोड-कडू अशा अनेक आठवणींच्या हिंदोळ्यावर असलेले मायकलचे आयुष्य कधी सावरलेच नाही...जगाला आपल्या तालावर थिकरवणा-या मायकेलने आयुष्यात असे अनेक दाहक अनुभव घेतले....
पण तरीही काहींना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची कला चांगली जमते. 'बाय हूक ऑर बाय क्रूक' हे त्यांच्यासाठी वेगळ्या अर्थाने लागू होतं. मायकेल जॅक्सनही त्यापैकीच एक. काही वेळा तर तो प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा (अप)प्रसिद्धीच त्याच्या मागे लागली. ७० च्या दशकात अमेरिकेला स्वत:च्या संगीतावर झुलायला लावलेला जॅक्सन जगभर प्रसिद्ध झाला, ते त्याच्या डान्समधल्या कॉम्प्लिकेटेड स्टेप्सनी.
रॉक, पॉप हे वेस्टर्न कल्चर. भारतातल्या हाय क्लासला या कल्चरची ओळख असली, तरी मुंबईतल्या चाळीपर्यंतही हे कल्चर पोहोचवलं ते मायकेल जॅक्सन आणि मडोनाने. अमेरिकेत पॉप म्युझिकच्या प्रेझेण्टेशनमधे एकीकडे कमालीचा बदल करतानाच डान्समधल्या त्याच्या फिजिकली कॉम्प्लिकेटेड स्टेप्सनी सर्वांनाच वेड लावलं. डान्स करताना हा माणूस हाडं बाजूला काढून ठेवतो का, याला गुरुत्वाकर्षणाचे नियमही लागू होत नाही का, असे प्रश्न गमतीने विचारले जात होते. याच दरम्यान मायकेलने नाकाचा शेप बदलण्यासाठी त्यावर १७ शस्त्रक्रिया केल्याची चर्चाही होती. पॉप म्युझिकवर डान्स करताना मायकेलने केलेल्या स्टेप्स महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागल्या. वेस्टर्न डान्स हे जॅक्सनच्या स्टेप्सशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना गेल्या दशकापर्यंत होती. जॅक्सनच्या या स्टेप्सपैकी सर्वात हिट ठरल्या, त्या रोबोट आणि मूनवॉक. हात हवेत स्थिर ठेवत हवेत चालण्याची कसरत नंतर बॉलिवूडच्या नायकांनीही अनेकदा करून दाखवली. एक वेळ अशी आली, की संगीतापेक्षा मायकेलचा डान्सच अधिक महत्त्वाचा ठरला...
असो, काही असलं तरी मायकल जॅक्सन आज गेला....असं म्हणतात की गंधर्वांना सर्व कला अवगत असतात, हा गंधर्व शापित होता. पण शापित असला तरी तो गंधर्व होता...आणि म्हणूनच तो गेला...आणि तोही अगदी मनाला चटका लावूनच !
मायकल जॅक्सन हे एक वादळ होतं...आणि आता हे वादळ ओसरलयं इतकचं.

Friday, June 19, 2009

जिहाल ए मस्ती...

अनेक दिवसांनी आज मनसोक्त संगीत ऐकावसं वाटलं...आणि सगळी कामे सोडून ते ऐकलं.
संगीतात किती ताकद आहे, मूळात भारतीय संगीत, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, अभिजात, सुगम, लोकसंगीत किंवा अन्य किती म्हणून व्हरायटी आहे त्यात.
भारतातल्या भाषा, त्या भाषांचा लहेजा, त्याला मिळालेली स्वरांची अन् सुरांची साथ...विलक्षण सौंदर्याचे आविष्कारचं या सा-यातून जन्माला येतात.
गुलाम अलीची 'ये दिल ये पागल दिल मेरा'...असंख्य वेळा ऐकूनही मनाची तृप्ती अशी होतच नाही.
त्यातील एक अंतरा...
'अब मै समझा तेरे रुक्सार पे तील का मतलब
दौलत-ए-हुस्न पे दरबान बिठा रख्खा है'...
शब्द, स्वर, गायकी, सुर सारं काही अगदी विलक्षण....गुलाम अली, ज्याचे साक्षात स्वर गुलाम आहेत, असे गायक. गझलमधील शब्दांचा सुरांच्या मदतीने प्रत्येक रेशीम पदर उलगडवून दाखवणारा एक समृद्ध गायक...
म्युझिक थेरपी हा प्रकार मला फारसा माहित नाही, पण ही थेरपी जर खरी असेल तर निश्चित संगीतामुळे माणसाच्या अनेक समस्या लीलया सुटू शकतील...
फार लिहायचयं, पण सध्या इतकचं.

Thursday, March 19, 2009

आनंदाचे डोही 'आनंद' तरंग(ले)!

आनंद यादव यांनी नियोजित साहित्य संमेलनाचा राजीनामा दिला. राजीनामा द्यावा लागला हेच खरे. हा विजय वारक-यांचा कि आनंद यादव यांच्या सारासार विचारबुद्धीचा. सारासार विचारबुद्धी हा शब्द प्रयोग अशासाठी केला आहे की, साहित्य संमेलनाला महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाकडून साहित्य संमेलनाला गालबोट लागू नये म्हणून दिला असावा, या अर्थी वापरला आहे.
संतपरंपरेचा वारसा लाभलेल्या या वारक-यांनी असा वार करावा हेच कोणत्याही सुजाण व्यक्तीच्या वर्मी लागण्यासारखे आहे. पण वारक-यांनी हे केले. झाले ते योग्य की वाईट याची चर्चा करण्यापेक्षा हे असे का झाले ? याचा विचार करण्यात मन गुंतले आहे.
वारक-यांची सतसतबुद्धी लोप पावत चालली आहे का, अशी क्षणभर शंका यामुळे आली. अभिव्यक्तीस्वातंत्र्यांची गळचेपी, आणि ती ही क्षमाशील आणि उदात्ततेचा वारसा लाभलेल्या वारक-यांकडून व्हावी हे दुर्देव आहे.
या मागे त्यांचा काही हेतू आहे की आता वारकरी हे वारकरी न राहता त्यांच्यातही झुंडशाही प्रवृत्तीचा अंतर्भाव झाला आहे, आणि आनंद यादव यांचा राजीनामा हे या झुंडशाही प्रवृत्तीने केलेले शक्तीप्रदर्शन आहे असा प्रश्न या निमित्ताने पडतो...
ही घटना खचितच व्यथित करणारी आहे.
तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे...
''आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू''...
वाकर-यांनी या प्रकरणी निषेधासाठी शब्दांची शस्त्रे केली असती तर केवळ लोकशाहीसाठी नाही तर त्यांच्या परंपरेचा आणखी एक प्रत्यय पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्रानं अनुभवला असता.