Sunday, July 19, 2009

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात...

सध्या सगळीकडे एक गोष्ट कायम ऐकायला येते की, मी फारच बिझी आहे. बिझी असणे हा जणू परवलीचाच शब्द बनलाय...पण नक्की बिझी असण्याची अवस्था म्हणजे काय असते ?
मानवाला मिळालेली दैवी देण म्हणजे मन. बिझी असण्यात मन किती बिझी असते, याचा सखोल विचार केला तर लक्षात येईल की बिझी म्हणवणा-या देहात असलेले मन खरोखरच बिझी आहे की सगळा नुसताच व्यर्थबोध !
मनाप्रमाणे काम नसले की माणसे केवळ शरीरारने कार्यरत असतात, आणि मनाप्रमाणे काम मिळाले तरी शारिरीक श्रमापासून सुटका नाही. तर अशावेळी मनाचा विचार कितीवेळा होतो...
अनेक दिवसांनी केवळ मनाचा विचार करण्यासाठी काही वेळ राखून केवळ मनाचा विचार केला. त्यावेळी मनामध्ये अनेक दिवसांपासून, अनेस विषयांवरच्या प्रश्नांचा केवळ कल्लोळ झालेला दिसला....या कल्लोळाला असलेली अथांगता पाहून मनात प्रचंड भीती निर्माण झाली...
...वाटलं की, मनात निर्माण झालेले एवढे प्रश्न, म्हटलं तर थेट आपल्याशी आणि आपल्या सभोवताली असणा-यांशी संबंधित...कधी सोडवणार आपण हे प्रश्न आपल्या बिझी असण्यातून....केवळ बिझी नाही तर मानवी जीवनातील असमाधानही कायम आहे, द्वंद्व संपत नाही, द्वेष-हेवा-मत्सर-स्वार्थ यांचा मनावरील पगडा जात नाही.

अशावेळी काय करायचे ?

प्रश्नांच्या या अथांग कल्लोळात मी खोलवर बुडून गेलोय...

Friday, July 3, 2009

गगना गंध आला...

...यावेळी पावसाची चातकापेक्षाही अधिक आतुरतेने वाट पाहात होतो. कंटाळलेल्या मनाने मग कुमार गंधर्वांचा मारवा आणि मग किशोरी आमोणकरांचा मेघ मल्हार ऐकला. कदाचित ते स्वर्गीय स्वर आळवले गेले असल्याने मुंबईत तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झालीये.

खिडकीतून पाहता येणारी आणि ऐकता येणारी पावसाची रिपरिप, आणि कुमारांचा आलाप, हा खरचं एक स्वर्गीय आनंद आहे. या निमित्तान संगीतावर ( ज्याची दुर्देवाने आता साथ सुटते आहे असं वाटतय ! ) काही काळ चिंतन केले...याच चिंतनाचा काही भाग तुमच्यासाठी....तुमच्या मनातील चिंतनही या निमित्ताने मी प्रतिक्रियांच्या माध्यमातून अपेक्षित आहे, या निमित्ताने धकाधकीच्या आयुष्यात थोडे मंथन होईल, अशी आशा मनाशी आहे.

शास्त्रीय संगीत जितका अभिजात प्रकार तितकाच काहीसा (काहींसाठी कंटाळवाणा), त्यामुळेच मग भावसंगीत या मातीत चांगलेच रुजले. किंबहुना शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातून उगम पावलेली, तरीही शास्त्रीय संगीताकडे पूर्णतः न झुकलेली शब्दप्रधान गायकी ‘भावसंगीत’ या संज्ञेने ओळखली जाते. शब्द, सूर, ताल, लय, आणि काव्यानुसार व्यक्त होणार्‍या संमिश्र भावना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘भावसंगीत’.
संगीताचा हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राचे अनोखेपण अधोरेखित करणारे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधात गायक कलाकारालाच नव्हे तर गीतकार, संगीतकार यांनाही अनेक प्रकारची कलात्मक व्यवधाने सांभाळावी लागतात. शब्दामागील स्वरांना किती स्पर्श करायचा, चालीतील दोन शब्दांतील अंतर, त्या शब्दांवर दिलेल्या विशिष्ट स्वरसंगती, स्वरसमूहातील अंतर आणि त्यामागील भावार्थ समजून काव्य तरल स्वरात मांडणे - हा भावसंगीताचा गाभा आहे. या गायकीसाठी गळ्याची वेगळी तयारी हवी, शब्दफेक तरल हवी, शब्द टाकण्याच्या पद्धतीत एक उत्कटता हवी, काव्यातलं ‘एक्स्प्रेशन’ गाण्यात मांडण्याची ताकद हवी, गाणार्‍याची तन्मय भाववृत्ती हवी -केवळ ताना, बोल ताना, सरगम घोटून हे येत नाही. हवा तो स्वर आवश्यक तितक्याच तीव्रतेने लागायला हवा. या सार्‍यांच्या जोडीला कलाकाराची वैयक्तिक प्रतिभा, शब्द आणि त्यांचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ शोधण्याची वृत्ती, संगीतकाराने सांगितलेली चाल आत्मसात करण्याची क्षमता आणि सादरीकरणातील मनःपूर्वकता - यांची नितांत आवश्यकता असते.

कवितेला जसे वृत्त असते, तशीच भावसंगीत गायनाची एक वृत्ती जोपासावी लागते. त्यासाठी काव्याची उत्तम, तरल जाण लागते. भावसंगीत हा गीतकार, संगीतकार, वादक आणि गायक यांनी सजवलेला संगीतरथ असतो. शब्द जितके सुंदर, जितके नेमके, तितकी चाल, सूर सहज उमटतात. अनेकदा ते शब्दच सूर घेऊन येतात. त्यांना नटवण्याचे काम संगीतकाराची प्रतिभा करते. कवी आणि संगीतकार मिळून एक ‘म्यूझिकल फ्रेमवर्क’ तयार करतात. त्याचे कानेकोपरे सुरेल करून उजळण्याचे काम गायक करतात.

कला ही आनंदनिर्मितीसाठी असल्याने सर्वांपेक्षा आनंदरस महत्त्वाचा असतो. मीलनाचे वा विरहाचे गीत असले, तरी ऐकणा-याला त्यातून आनंदाची अनुभूती येणे महत्त्वाचे असते...

काहीही असो...पाऊस आला आणि गगना गंध आला !